सोमवार, ११ जुलै, २०२२

अस्थिर जगणाऱ्या माणसाच्या आयुष्याचा राडा..


 

राडा...

भाऊ पाध्ये यांचे हे मी वाचलेले दुसरे पुस्तक. नावा प्रमाणे या पुस्तकात आयुष्यात सगळं काही असूनही आयुष्यात कसली तरी कमी असते आणि मग एकट्याचा जो वेडावाकडा प्रवास चालू असतो, त्याने अनेक राडे निर्माण होत असतात, त्याने आपले सख्खे, आजूबाजूचे सगळेच त्रस्त असतात. याच राड्यांचे वास्तववादी लिखाण म्हणजे हे पुस्तक. भाऊ पाध्ये म्हणजे सडेतोड लिखाण, शिव्या,वास्तव याचं जसच्या तसं वर्णन  लोकांपर्यंत पोहचवायच, मग ते लोकांना पचनी पडो किंवा पडो पण वास्तव मात्र लिहायचं, असा हा लेखक  या पुस्तकात मंदार अण्णेगिरी या एका उद्योगपती असलेल्या बापाचा मुलगा, शिवसेना आणि समाजात असणाऱ्या अनेक वल्लींचे एकमेकांशी कसे गुंतागुंतीचे संबंध असतात हे अगदी आपल्या सहज लेखनातून वाचकाला दाखवून देतो. बऱ्याचदा आपण करत असलेल्या कृत्याने समाजाला काय फरक पडतो असा विचार आपण करत असतो, पण हेच कसं चुकीचं आहे हे या कादंबरीतून कळतं

या कादंबरीत त्या काळातल्या शिवसेनेचे काम, शिवसेनेच्या माणसांची दादागिरी, फायद्याच्या ठिकाणी करत असलेली setting अशा वेगवेगळ्या गोष्टींवर बेधडक लिहणाऱ्या या लेखकाच्या पुस्तकावर त्या काळात शिवसेनेने बंदी ही आणली होती. या पुस्तकात मंदार आपल्या श्रीमंत घरापासून दूर राहत शिवसेनेच्या नाना विरोधात बिनधास्त एकटाच नडतो, श्रीमंत बापाचा मुलगा म्हणून बऱ्याचदा ही मंडळी मंदारच्या चुकांकडे दुर्लक्ष करतात. पण मंदारच्या अती वागण्याने त्यांनाही याच्या विरोधात काही करावं असंच वाटत असतं. मग नक्की ही मंडळी त्याच्या विरोधात काही करतात का? खुबसुरत काकू मंदारला यातून बाहेर काढण्यासाठी बरेच प्रयत्न करते,त्याची दारू सोडवण्यासाठी वेगवेगळे पर्याय शोधते,पण तिला खरंच यात यश येते का? दारूची नशा,शिवसेनेच्या लोकांचा राग या सगळ्या द्वेषातून मंदारच्या हातून एक मोठी चूक घडते,मग मंदार त्या चुकीतून बाहेर पडतो का? हे सगळं सोडून तो आपल्या घरी परततो का? मंदार याचे वडील प्रसिद्ध उद्योगपती मुकुंद यांना आपल्या मुलाने व्यसन सोडून आपला व्यवसाय करावा असंच वाटत असतं,पण ही त्यांची इच्छा खरंच पूर्ण होते का? नक्की मंदार या व्यसनाकडे, घर सोडून चुकीच्या मार्गाकडे का गेला? त्याला नक्की काय कारण असेल? या अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरासाठी हे पुस्तक नक्की वाचन केलं पाहिजे. बऱ्याचदा आपल्याला असे अनेक मंदार आपल्या समाजात दिसत असतील. कदाचित हे पुस्तक त्यांना बदलण्यासाठी नक्कीच उत्तर देते.

बऱ्याचदा हे पुस्तक म्हणजे एखादा चित्रपटच वाटतो, प्रत्येक सीन, संभाषण, पात्र यांच्या विविध छटा आणि त्यांचे महत्व लेखकाने राखण्याची नक्कीच काळजी घेतलेली आहे. मला वाटतं अगदी नेहमीचीच रटाळ तेच काल्पनिक, वास्तवरहित विषयाचे वाचन करण्यापेक्षा आपल्याच अवतीभवती असलेल्या विषयाचे वाचन करताना कदाचित आपण त्यात मिसळून जातो. भाऊ पाध्ये यांचे लिखाण याच पठडीतले आहे, अगदी खिळून ठेवणारे. मग नक्की वाचा.



लेखकाची ओळख :

दीपेश मोहिते, कल्याण

लिहायला, वाचायला आवडतं. निसर्ग भ्रमण, पक्षी निरीक्षण  करायची आवडं.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन

 कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन   काही चांगल्या / कमावत्या मुलांची लग्न ठरत नाही मग ती मुलं किंवा त्याच्या घरचे मुलींना...