शुक्रवार, ८ सप्टेंबर, २०२३

इंडिया काय नि भारत काय || What is India, and what is Bharat?


apaliwritergiri_blogpsot_india_bharat_politics_News
PC:google

इंडिया काय नि भारत काय

मले काय मिळून राहिले त्याचे

इंडियाचा भारत करा नाही तर भारताचा इंडिया करा

मले काय मिळून राहिले त्याचे


मले सांग,

याने देशातला जाती-धर्म भेद थांबेल काय ?

दरवेळी दंगलीत मरणारा सामान्य माणूस "भारत माता कि जय " बोलला तर मरायचा वाचेल काय ?

नाही ना .. मग इंडिया काय नि भारत काय

मले काय मिळून राहिले त्याचे



मले सांग,

शेतकरी आत्महत्या थांबेल काय ?

जमिनी, नदी आणि जंगलांचा विनाश होणे थांबेल काय ?

नाही ना .. मग इंडिया काय नि भारत काय

मले काय मिळून राहिले त्याचे



मले सांग,

स्त्रीभ्रूण हत्या थांबेल काय ?

भारतात निर्भया निर्भयपणे राहू शकेल काय ? रात्रीची एकटी फिरू शकेल काय ?

नाही ना .. मग इंडिया काय नि भारत काय

मले काय मिळून राहिले त्याचे



मले सांग,

मणिपूर जळायचे थांबेल काय ?

काश्मीर मध्ये सुरक्षित वातावरण मिळाले काय ?

गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत होणारी जाती पातीची भांडण थांबतील काय ?

नाही ना .. मग इंडिया काय नि भारत काय

मले काय मिळून राहिले त्याचे



मले सांग,

"भारत" म्हटले कि, मले नोकरी मिळेल काय ?

चांगले सरकारी शिक्षण मिळेल काय ?

सरकारी हॉस्पिटल मध्ये चांगल्या सुविधा मिळतील काय ?

बिना खड्याचे चांगले रेशन मिळेल काय ?



नाही ना .. मग इंडिया काय नि भारत काय

मले काय मिळून राहिले त्याचे



म्हणजे तुझा विरोध आहे ना "भारत" नावाला ..

बापाओ पुन्हा तेच

विरोध करून मले काय मिळणार

समर्थन करून मले काय मिळणार

राजा बदलतो तसे राज्यांचे नाव बदलते

आतापर्यन्त १००हुन अधिक जिल्हे किंवा राज्याची नावे बदलली आहेत

पण

मले काय मिळून राहिले त्याचे

राजा नाव बदलत राहतो पण प्रजेचे समस्या आणि प्रश्न मात्र बदलत नाही


अंजली प्रविण  

amkar.anju@gmail.com


सोमवार, २८ ऑगस्ट, २०२३

लुनाना: अ याक इन द क्लासरूम || Lunana: A Yak in the Classroom Movie Review

 "लुनाना: अ याक इन द क्लासरूम" एका सत्यकथेवर आधारित चित्रपट आहे. " जिग्मे दोरजी" यांच्या जीवनाचा शिक्षक म्हणून प्रवासाचे यात चित्रण केले आहे. " शिक्षकाच्या हातात भविष्याची चावी असते." हा महत्व पूर्ण संदेश या चित्रपटाने मांडला आहे. "लुनाना" गावातील शाळा हि फक्त भूतान मधील नाही तर जगामधील सर्वात दुर्गम गावातील एक शाळा आहे. या गावात पोहचण्यासाठी ७-८ दिवस पायी प्रवास करावा लागतो. हिमालयाच्या कुशीत वसलेले हे गाव आहे. जिथे जवळपास रस्ता नाही, वीज नाही, दुकान नाही आणि हॉस्पिटल नाही. शाळा आहे पण ती देखील हिवाळा सुरु झाल्यावर बंद होते.  कारण हिमालयात नदी बर्फाने गोठू लागल्यावर या गावातून कुठेच प्रवास करता येत नाही. 

Lunana A Yak in the Classroom movie review apali writergiri blog
PC:Google

या चित्रपटात भूतानमधील आधुनिक शहर आणि ग्रामीण पारंपरिक  जीवनाचे सुंदर चित्रण केलेले पाहायला मिळते.  या चित्रपटाची कथा एका "उग्येन" नामक तरुण आणि महत्त्वाकांक्षी शिक्षकाभोवती फिरते. उग्येन हा सरकारी शाळेत शिक्षक असतो. पण त्याला शिक्षक म्हणून त्या नोकरीत अजिबात रस नसतो आणि काम करण्याची इच्छा नसते. त्याला  ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन गायक बनायचे असते. त्याला आरामदायी आणि सुखसोयीने समृद्ध वाटणारे  शहरी जीवन जगायचे असते. पण शाळेसोबत झालेल्या कॉन्ट्रॅक्टमुळे अनिच्छेने त्याला " लुनाना" नामक  दुर्गम गावात शिकवण्याची जबाबदारी दिली जाते. करारानुसार शेवटचे ३ महिने शिल्लक असतात म्हणून तो 'लुनाना' गावी जाण्याचा निर्णय घेतो.  शहरातून "लुनाना" गावी पोहचण्याचा प्रवास  खूपच चित्तथरारक आहे.  

७ दिवसांच्या प्रवासानंतर 'लुनाना' सारख्या दुर्गम गावात पोह्चयल्यावर मात्र त्याला आपण इथे शिकवण्याची जबाबदारी पार पाडू शकत नाही म्हणून पुन्हा घरी जाण्याची विनंती करतो. कारण तिथे  ना वीज, ना रस्ता, ना मोबाईलला नेटवर्क, ना शौचालय, ना फळा वैगरे  शहरासारखी कोणतीच आधुनिक सुविधा नसते. पण तेथील सरपंच सांगतात कि, "लगेच परतीचा लांब प्रवास अशक्य आहे कारण प्रवासाचा थकवा दूर होण्याकरिता काही दिवस थांबण्याचा सल्ला त्याला दिला जातो." 

त्या वेळी उग्येन गावातील मुलांना शिकवण्याचा आणि स्थानिकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो.  गावाची संस्कृती, दैनंदिन जीवन आणि चित्तथरारक हिमालयीन आयुष्य कसे असते हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. या गावातील गावकऱ्यांचा निसर्ग आणि पर्यावरण यांच्याशी घट्ट नाते आहे. यासाठी ते कायम निसर्गाचे उपकार मांडत असतात. "याक" हा इथला देवाप्रमाणे मानला जाणारा एक प्राणी आहे. याकचे इथल्या ग्रामीण पारंपरिक जीवन आणि निसर्गाशी महत्वपूर्ण जोडणारे गुंतलेले नाते आहे. उग्येनला  संपूर्ण गावात "शिक्षक" म्हणून त्याला खूप मान मिळतो कारण, इथे  "शिक्षकाच्या हातात भविष्याची चावी असते." हि महत्वपूर्ण शिकवण त्याला शिकायला मिळते.  एक निराश, इच्छा नसणारा शिक्षक ते  गावातील विद्यार्थ्यांना शिक्षण किती महत्वपूर्ण आहे म्हणून आपुलकीची भावना शोधणाऱ्या व्यक्तीपर्यंतचा प्रवास खात्रीपूर्वक चित्रित केला आहे, ज्यामुळे प्रेक्षकांना त्याच्या व्यक्तिरेखेशी भावनिक पातळीवर जोडता येते. 

भूतान मधील पहिला ऑस्कर नॉमिनेशनला पोहचलेला हा चित्रपट आहे. तसेच याला अनेक आंतरराष्ट्रीय अवॉर्ड मिळाले आहेत. हा चित्रपट एका सरकारी शिक्षकाचा प्रवास दाखवतो. चित्रपटातील सुंदर हिरवळ असेलेले गाव, साधी माणसे आणि साधी राहणी प्रेक्षकांना नक्कीच भुरळ घालतो. चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफी भूतानच्या लँडस्केपचे विस्मयकारक सौंदर्य कॅप्चर करते, दर्शकांना दुर्गम आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या जगात पोहोचवते. २019 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता. अमझोन प्राईमवर हिंदी भाषेत हा चित्रपट आपल्याला पाहायला मिळेल. 


-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

लेखिका : अंजली प्रविण, ८+ वर्षांपासून समुपदेशक आणि डेटा विश्लेषक  म्हणून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. 

amkar.anju@gmail.com





 

शनिवार, १९ ऑगस्ट, २०२३

खरी कोकणी भाषा कोणती ?

खरी कोकणी भाषा कोणती ?

kokan-kokani-konkani-malvani-language-bolibhasha-apaliwritergiri


गोव्याकडचे बोलतात कि, " कोंकणी आमची भाषा हीच खरी गोवन कोकणी भाषा." सिंधुदुर्ग- मालवणकडचे बोलतात कि, "आमची मालवणी म्हणजे खरी कोकणी भाषा." तेव्हा रत्नागिरीचे बोलतात कि, " संगमेश्वरी आणि चिपळूणची भाषा पण कोकणीच भाषा आहे. "  - रायगडचे  बोलतात कि, " आमची आगरी - कोळ्याची भाषा पण कोकणीच भाषा आहे."  "अमुक अमुक जिल्ह्याचे रहिवाशी म्हणजे कोकणी.  यात तळकोकणी, मध्यकोकणी, गोवन कोकणी , मंगलोरीयन कोकणी असे "   अंतर्गत मतभेद होताना सर्रास दिसतात. खरंतर, कोकणचा विस्तार विशाल आहे. महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकच्या पश्चिमेकडील भागात पर्यंत पसरलेला आहे. पूर्वेस सह्याद्री म्हणजे  पश्चिम घाट पर्वत रांग आहे आणि पश्चिमेला अथांग अरबी समुद्र आहे. 

भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कोकण पट्ट्यात बोलली जाणारी कोंकणी ही एक "इंडो-युरोपीय" भाषा आहे. महाराष्ट्र, कर्नाटकाचा किनारपट्टीचा भाग आणि गोवा येथे ती प्रामुख्याने बोलली जाते. अगदी बारा-बारा  मैलावर गाव बदलत जाते तसे बोलीभाषेत बदल होताना दिसतात. कोकणी, कोंकणी, मालवणी, संगमेश्वरी,  चित्तपावनी, वारली, काणकोणी, डांगी वगैरे अनेक बोलीभाषा या कोंकणीच्या उपभाषा आहेत.

जसे कोकणी भाषा बोलण्यात विविधता आहे तशी लिहिण्यात हि तितकीच विविधता दिसून येते. महाराष्ट्रात देवनागरी, गोव्यात देवनागरी आणि रोमन लिपी, कर्नाटकात कानडी, केरळातील कोकणी मल्याळी लिपी आणि कोकणी मुसलमान अरबी लिपी लिहिण्यासाठी वापरतात. गोवा राज्याने "कोंकणी आणि मराठी " या दोन्ही  भाषण सम राज्यभाषा म्हणून दर्जा दिला आहे.

यात हि धर्मानुसार आणि जातीनुसार अजून भाषेत बदल होताना दिसतो.  ख्रिश्चनांची कोंकणी, हिंदूंची कोंकणी आणि मुस्लिमांची कोकणी असेही फरक दिसतील.  ख्रिश्चनांची  कोकणी भाषेवर पोर्तुगीज भाषेचा प्रभाव दिसतो, मुस्लिमांच्या कोकणी बोलीभाषेत हिंदी- उर्दू आणि अरबीचा भाषेचा प्रभाव दिसतो. 

जसे गाव बदलते तसे बोलण्याच्या लयीत देखील अनेक बदलत दिसून येतात. का र्रर्रर्रर्र बाला ... " काही ठिकाणी र चा सूर दिसेल. तर काही ठिकाणी उच्चराचें  हेल बदललेले दिसतील. आता साधे खालील एका शब्दाचे वेगवेगळे उच्चार पाहू.
बसला आहे
बसलोसा
बसल्यानी
बसलंस
बसतंस
बसलीव
बसलंय
बसलेय

कोकणातल्या वेगवेगळ्या बोलीभाषेतील वेगवेगळ्या कला आणि साहित्य हे जगभर प्रसिद्ध आहे. आपण हि अनेकदा पाहिले असेल कि,  जगभरात किंवा भारतात महाराष्ट्राचे  नेतृत्व करताना कोळी गाणे आणि नृत्य सादर केले जाते. आगरी कोळी गाण्यांविना शाळेचे सांस्कृतिक संमेलन किंवा लग्न समारंभ पूर्ण होत नाही. मच्छिद्र कांबळे मालवणचे नाट्यसम्राट यांनी तर "मालवणी" भाषा सातासमुद्रापार पोहचवली. " गाव गाता गजाली, मालवणी डेज, रात्रीस खेळ चाले " यांसारख्या मराठी मालिकाही कोकणी भाषेत पाहायला मिळतात.  तसेच मराठी साहित्यात हिविंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, मधु कर्णिक, जयवंत दळवी, वि. नेरुरकर, पेडणेकर वैगरे अनेक लेखनाचे साहित्यही वाचायला मिळेल.
एकाच फुलाला वेगवेगळ्या पाकळ्या असतात तसे  कोकणातील वेगवेगळ्या बोलीभाषा पाहायला मिळतील. जशी फुलाची एक पाकळी नसेल तर फुल अपूर्ण दिसेल तसे या प्रत्येक बोलीभाषेचे तितकेच महत्व आहे. बोलीभाषेत वेगळेपण असले  तरीही माझी बोली भाषा म्हणजे ओरिजनल असे मतभेद  यायला नको. प्रत्येक बोलभाषेची गोडी तितकीच मधुर आहे. हे कायम लक्षात ठेवावे.   एकूणच "बोलणाऱ्यांन बोलत रवाचा आणि ऐकणाऱ्यानं ऐकत रवाचा" अशी कोकणी भाषा आहे.
 

बुधवार, १६ ऑगस्ट, २०२३

शांतता! कोर्ट चालू आहे || Shantata! Court Chalu Ahe || Vijay Tendulkar

 शांतता! कोर्ट चालू आहे...

"शांतता कोर्ट चालू आहे" विजय तेंडुलकर यांचे नाटक भारतभर १४ भाषांमध्ये प्रदर्शित झाले. ज्यात १९६७ मध्ये त्यांनी "कुमारीमाता- भ्रूणहत्या " सारख्या  विषयाची मांडणी केली आहे.  गंमत म्हणजे या नाटकाचे मला विकिपीडिया पेज दिसले. पण जेव्हा त्या ते पेज वाचले तेव्हा  लक्षात आले कि, यात नाटकाच्या विषयाबद्दल काहीच लिहिले नाही.  त्यानंतर अजून काही लेख शोधण्याचा प्रयत्न केला तरीही फारसे लिखाण दिसले नाही. 

shantata-court-chalu-ahe-vijay-tendular-sulabha-deshpande-apaliwitergiri


"विजय तेंडुलकर"  हे नाव ऐकले कि साहजिकच त्यांनी लिहिलेली नाटके डोळ्यासमोर  उभी राहतात. घाशीराम कोतवाल, सखाराम बाइंडर, कमला, गिधाडे, माणूस नावाचे बेट यासारखे अनेक प्रसिद्ध नाटके त्यांनी लिहिली. त्यांनी ६०-७० च्या दशकात लिखाणातून एक वेगळी क्रांती करण्याचा प्रयत्न केला. नाटक हे फक्त विरंगुळ्यासाठी किंवा मनोरंजनासाठी नसून त्यातून समाजाचा आरसा देखील दाखवता येतो. त्यांनी अनेक सामाजिक विषयांवर प्रकाश आपल्या लिखाणांमधून टाकला.  यांच्या खडतर स्पष्टपणामुळे त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आणि त्यांच्यावर टीका विरोध हि तितकेच झाले. 


त्यातीलच एक नाटक म्हणजे "शांतता कोर्ट चालू आहे." या नाटकाला ५५हुन हि अधिक वर्षे पूर्ण झाली. या नाटकातील प्रमुख पात्र  'सुलभा बेणारे' ही भूमिका करणाऱ्या सुलभा देशपांडे यांना अमाप लोकप्रियता मिळाली होती. त्यांनतर "रेणुका शहाणे" यांनी हि भूमिका पार पडली.  


या नाटकात एक नाटक कंपनी दाखवली आहे.  ज्यात बेणारे बाई या शिक्षिका या नाटक कंपनीतील अभिनेत्री असतात.  जे न्यायालयीन खटल्याचे नाट्यमय रूपांतर सादर करीत असतात. या नाटकात असेच सर्व कलाकार दुसऱ्या ठिकाणी नाटकाच्या सादरीकरणासाठी जातात पण त्याचवेळी त्यांच्यातील एक कलाकार नाहीसा होतो. 

त्याच्या जागी ते एका नवीन पात्राला घेतात. पण त्याला नाटक म्हणजे काय हेही माहित नसते. नाटक सुरु होण्यासाठी देखील अजून वेळ असतो म्हणून त्या नाटक कंपनीतील  बेणारे बाई नावाच्या पत्रावर खोटा खटला लढवून त्याला नाटक  शिकविण्याचे ठरवतात. बेणारे बाईच्या आयुष्यात आलेले पुरुष येऊन बेणारे बाई कशी बेताल बाई आहे हा आरोप तिच्यावर लावण्यात येतो.  हा खोटा आरोप आणि खोटा वाटणारा खटला कसा तिच्या वैयक्तिक आयुष्यातील खऱ्या घटनांना जोडला जातो.   त्यानंतर बेणारे बाईच्या आयुष्याचे सत्य स्वरूप बाहेर पडते. समाजाकडून तिच्यावर आरोपांचा भडीमार सुरु होतो. यात फक्त आणि फक्त स्त्रीलाच दोषी कसे ठरविले जाते. यातून सुटण्याचा ती खूप प्रयत्न करते. पण तिला ते शक्य होत नाही.  यातील बेणारे बाईने " जीवन हि एक महा भयंकर गोष्ट आहे. " या मनोगताच्या वेळी जीवन आणि समाजाचा क्रूर चेहरा समोर मांडण्याचा प्रयत्न करते.  'कुमारीमातेला' दिली जाणारी दूषणे, कलंक, आरोपांचा भडीमार, समाजापासून एकटे करणे. अश्या अनेक मुद्द्यांवर बेणारे बाई हे पात्र भाष्य करते.   


आज हि  आपल्या  आधुनिक समाज सहज कुमारीमाता ताठ मानेने चारचौघात राहताना दिसणार नाही. एक तर तिला आश्रमात ठेवले जाते किंवा राहते घर - कुटुंबापासून दूर कोणत्या तरी गावी ठेवले जाते. जिथे तिला कोणी ओळखत नाही. जर अशी कुमार माता समोर आली तर, आज हि तितकीच मौन पाळले जाते. आणि त्या मौनातून तिला दोषी ठरविले जाते. तिच्या जीवावर बेतून गर्भपात केले जातात किंवा भ्रूणहत्या केली जाते किंवा त्या बाळाला मंदिरात सोडून दिले जाते. विजय तेंडुलकर यांच्या लिखाणातील काळातही संकुचित मानसिकतेचा समाज दाखविला आहे.  आज काळ बदलला तरीही समाजाची मानसिकता मात्र अजूनही तशीच संकुचित राहिली आहे. 


सदर नाटकाची लिंक  : 

शांतता कोर्ट चालू आहे . 



Anjali Pravin

amkar.anju@gmail.com


मंगळवार, १५ ऑगस्ट, २०२३

Animal Farm by George Orwell

 एनिमल  फार्म || Animal Farm by George Orwell

Animal Farm by George Orwell

सारांश : "एनिमल  फार्म" हे पुस्तक जॉर्ज ऑरवेल लिखित असून त्यांनी राजकीय व्यवस्थेवर उपहासात्मक लेखन केले आहे.  या लेखकाच्या लेखनाला अनेकदा विरोध झाले कारण यांच्या लेखणीतून, "लोकशाही आणि हुकूमशाही यातील अंतर हे खूप कमी आहे. लोकशाही केव्हा हुकूमशाहीत बदलते आणि लोकप्रतिनिधित्व करणारा नेता कसा हुकूमशहा बनू लागतो." या कांदंबरीच्या माध्यमातून  या कडवट राजकारणावर एक प्रकाश टाकला आहे. 


जॉर्ज ऑरवेल लिखित ऍनिमल फार्म या पुस्तकाचे  १७ ऑगस्ट १९४५ प्रथम इंग्लंडमध्ये या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या पुस्तकाचे  प्रकाशन होण्याआधीपासून दुसरे महायुद्ध सुरु झाले होते. या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी देखील अनेक संघर्ष त्यांना करावा लागला होता. कारण त्याच दरम्यान जर्मनीने इंग्लंडवर हल्ला केला होता.  या पुस्तकाच्या माध्यमातून राजकारणातले व्यंगचित्र शब्दांमध्ये मांडण्याचा एक  यशस्वी प्रयत्न केलेला दिसेल. या पुस्तकाच्या माध्यमातून 'सोविएत मिथ' सोविएत रशियातील वरकरणी   साम्यवादी वाटणाऱ्या व्यवस्थेवर उपहासात्मक लेखन केले होते.  या पुस्तकाच्या प्रकाशनाला विरोध होण्याचे मुख्य कारण म्हणजे याच दरम्यान सोविएत युनियनच्या गुप्तचर विभागाने या लेखकाच्या लेखनावर बंदी घातली होती.  

खरंतर, हे पुस्तक त्यावेळी होणाऱ्या राजकीय घडामोडीवर प्रकाश टाकणारे होते पण जर याची तुलना आताच्या राजकारणासोबत केली तरीही फारसा काहीच बदल न झालेला आपल्याला लक्षात येईल. 

"नेता" हा कायम लोकांनी लोक कल्याणासाठी निवडून दिलेला असतो. जो त्या लोकांचे प्रश्न मांडतो. लोकांना एकत्र करतो. लोकांना योग्य ते  मार्गदर्शन करतो. लोकांच्या समस्यांचे निवारण करण्याचा तोडगा शोधतो. पण हा नेता लोकांचे प्रतिनिधित्व करत नसेल तर किंवा लोकांच्या समस्यांचे निवारण न करता चुकीच्या गोष्टींचे नेतृत्व करायला लागला तर.... "एनिमल  फार्म"  या कादंबरीत अश्याच लोकशाहीचे नेतृत्व करणाऱ्या सत्ताधारी राजकारणाची वास्तविकता मांडण्याचा प्रयत्न केला आहे. 

 "एनिमल  फार्म"  या कादंबरीतील कथा हि एका फार्म हाऊसची आहे. जिथे मालक, कामगार आणि सगळे प्राणी एकत्र राहतात. कुत्रा, मांजर, डुक्कर, घोडे वैगरे प्राणी एकत्र राहत होते. एकदा या सर्व प्राण्याची एकत्र मिटिंग होते. यात अशी चर्चा होते कि, हे सर्व प्राणी दिवस- रात्र खूप मेहनत करतात. मात्र या मेहनतीचा सर्व फायदा मात्र मनुष्याला होतो. आपल्याला पुरेसे अन्नदेखील मिळत नाही.  आपल्याला योग्य न्याय व हक्क मिळत नाही. तेव्हा येथील एक म्हातारा डुक्कर सर्व प्राण्यांना एकत्र करून मालकाविरुद्ध  बंड पुकारायला एकत्र येण्याचे ठरवितात. त्याच दरम्यान म्हातारा डुक्कर मरण पावतो तेव्हा येथील दुसरे  दोन डुक्कर नेपोलियन आणि स्नोबॉल नावाचे या गटाचे  नेतृत्व करत असतात. सर्व मिटिंगमध्ये चर्चेनंतर असे ठरविले जाते कि, आपण क्रांती करायची. आपण फार्म हाऊस आपल्या ताब्यात ठेवायचे. या मीटिंगप्रमाणे सर्व प्राणी एकत्र येतात. त्या "मॅनॉर फार्म" च्या मालकाला फार्म बाहेर काढण्यात यशस्वी होतात. त्याचवेळी "मॅनॉर फार्म" चे नाव "ऍनिमल फार्म" असे ठेवण्यात येते त्यासोबत या फार्म मध्ये प्राणिवादाचे काही नियम ठरविण्यात येतात. जसे सर्व प्राणी समान आहेत, मित्रत्व ठेवणार, कोणताही प्राणी कपडे घालणार नाही, दारू पिणार नाही, दुसऱ्या प्राण्याला मारणार नाही, बिछान्यात झोपणार नाही आणि मनुष्य त्यांचा शत्रू असणार. सर्व प्राणी एकत्र आनंदी राहत असतात. मुबलक अन्न आणि शेती सुरळीत सुरु असते. 

त्याच दरम्यान इथले दोन नेतृत्व करणारे लीडर 'नेपोलियन' तत्वांचे महत्व प्राण्यांना शिकवत असतो तर 'स्नोबॉल' शिक्षण आणि आधुनिक शेती शिक्षण यांचे काळानुसार बदल किती महत्वाचे आहे हे प्राण्यांना शिकवत असतो. नेपोलियन मात्र या आधुनिकीकरणाच्या  विरोधात असतो. यावेळी नेपोलियन इतर प्राण्यांच्या मदतीने स्नोबॉलला फार्म बाहेर हाकलून लावतो. अखेरीस तो स्वतःला "सर्वोच सेनापती" घोषित करतो. त्यानंतर हळूहळू त्या फार्म च्या नियमात बदल होऊ लागतात. ज्या समस्यांमुळे प्राणी एकत्र आलेले असतात. पुन्हा त्याच समस्यांमध्ये ते प्राणी अडकलेले दिसतात. 

एकूणच, लोकशाहीचे रूपांतर हुकूमशाहीत कसे बदलते. हा प्रवास लोकांच्या  डोळ्यात  अंजन घालणारा आहे .  "राज्यव्यवस्था जरी बदलली, तरीही सर्व सामान्य जनतेचे प्रश्न आणि समस्या मात्र बदलत नाही." या पुस्तकात लोकांचा निरपेक्ष नेता सत्ता मिळाल्यावर मात्र आपल्याच लोकांमध्ये मतभेद करू लागतो. हे वर्णन करणारे सुंदर वाक्य यात लिहिले आहे. "All animals are equal, but some animals are more equal than others." " सर्व प्राणी समान आहेत पण काही प्राणी इतरांपेक्षा अधिक समान आहेत."

काळ दशकांत बदलतोय पण राजकारणाचा पॅटर्न मात्र सेम... या पुस्तकाच्या शेवटी अजून एक सुंदर वाक्य आहे.

"The creatures outside looked from pig to man, and from man to pig, and from pig to man again; but already it was impossible to say which was which." " बाहेरून पाहणाऱ्याला कायम भ्रम होत राहतो कि, समोर नेमका डुक्कर आहे कि माणूस,  माणूस आहे कि डुक्कर,  आणि डुकराकडून पुन्हा माणूस ; पण कोण माणूस आणि कोण डुक्कर, हे सांगणे अशक्य होते. 


-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

लेखिका : अंजली प्रविण, ८+ वर्षांपासून समुपदेशक आणि डेटा विश्लेषक  म्हणून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. 

amkar.anju@gmail.com






आजादी का अमृत महोत्सव vs निःशब्द भारतीय || Amrit Mahotsav of Independence vs Quiet Indian

आजादी का अमृत महोत्सव vs निःशब्द भारतीय  

apali-writergiri-azadi-15th-august-india-swatantryadin


गेल्या काही वर्षात स्वातंत्र्यदिन हा फक्त झेंडा फडकविण्यासाठी, त्या झेंड्यासमोर फोटो किंवा सेल्फी काढण्यापुरता मर्यादित राहिला आहे. त्याचे फोटो सरकारी वेबसाईटला टाकले तर त्याचे पार्टीसिपेशन सर्टिफिकेट घेण्याचे पण नवीन फॅड सुरु आहे.  हा शोऑफ केला कि, " तुमचे भारतीयत्व खरे असे ठरविले जाते." अन्यथा तुम्ही बाटलेले किंवा देशद्रोही ठरता. 


आज इंग्रंजांच्या गुलामगिरीतून  स्वातंत्र्य होऊन ७५ वर्षे पूर्ण झाली. पण  तेव्हापासून भारत राजकारणींच्या गुलामगिरीत अडकत गेला. भारतात "लोकशाही" राज्यव्यवस्था स्थापन तर झाली पण "लोकशाही" अमलांत मात्र अजूनही आलेली नाही.    देशाला स्वातंत्र्य  मिळाल्यानंतर अनेक सकारात्मक स्वप्न भारतीयांच्या मनात रुजली होती. " लोकशाही देश किंवा स्वतंत्र भारत म्हणजे आपण आपला नेता निवडणार. जो लोकांचे प्रतिनिधित्व करणार. जनकल्याणाचे काम निःपक्षपणे करणार. देशातील चांगले शिक्षण, रोजगार, आरोग्य, अन्नपुरवठा यांसारख्या मूलभूत गरजांसाठी पहिले प्राधान्य देणार. भारत धर्मनिरपेक्ष असणारा पहिला देश ठरणार. भारतात स्वातंत्र्य, समता आणि बंधुता असणार. आपल्याला आपल्या देशात सुरक्षित वातावरण मिळणार. पण वास्तविकता मात्र पूर्णपणे उलट आहे. भारतातील लोकशाही फक्त  "धर्म आणि पैसा" या दोनच गोष्टींवर अवलंबून आहे.

आजादी का अमृत महोत्सव निमित्ताने  प्रत्येक भारतीयासाठी काही प्रश्न या लेखाच्या माध्यमातून मांडत आहे. खालील प्रश्नांचा आणि मुद्द्यांचा नक्की विचार पुढच्या मतदाना आधी केलाच पाहिजे. 


१.  क्लार्क असो किंवा  IPS ऑफिसर लाखों तरुण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात. त्यातील जेमतेम ५ ते १० टक्के उत्तीर्णांना सरकारी क्षेत्रात काम करण्याची संधी मिळते. पण लोकांचा नेता - राजकारणी बनण्यासाठी "मोठा गुन्हा करणे" हि पात्रता असते का ?  ज्या व्यक्तींवर कालपर्यंत करोडोंचा भ्रष्टाचार, स्त्रीचे लैंगिक शोषण आणि खूनासारखे गंभीर आरोप असतात.  या लोकशाही देशातील जनता त्याच व्यक्तीला कशी निवडून देते ? एकीकडे सामान्य माणसाने जर साधी चोरी केली तर त्याला समाजात कुठेच नोकरी मिळत नाही. पण सध्या मंत्रिमंडळ ते आपल्या गावातील सरपंचपर्यंत  सर्व नेते खुलेआम गुंडगिरी करतात किंवा त्यांचे कार्यकर्ते खुलेआम दादागिरी करतात. याना कोणत्याही कायद्याचे भय का नसते ? उलट या लोकनेत्याला किंवा कार्यकर्त्यांना सामान्य जनता का घाबरून असते ? मग तरीही आपण याना का निवडून देतो ? या विरुद्ध सर्व जनता एकञ का येऊ शकत नाही ?  


२.  गल्ली गल्लीत  किंवा गावो गाव "मंदिरे / मस्जिद /चर्च  " दिसतील. या धर्मस्थळांसाठी करोडो खर्च होतात. करोडोंची देणगी देखील आपली भारतीय जनता देते. " मंदिर याही बनेगा" घोषणा करत करोडो लोक रस्त्यावर उतरतात. दंगली करतात.  मात्र हि जनता आपल्या गावात "रस्ते नाही, पाणी नाही,  शाळा नाही, दवाखाना नाही किंवा रोजगार नाही यासाठी का एकत्र येत नाही?"  आपण ज्या नेत्याला मत देतो तो मात्र रस्ते, शाळा, दवाखाना वैगरे अनेक आश्वासने देतो. त्यासोबत धर्माच्या नावाने  कीड डोक्यात सोडून जातो. त्यानंतर दवाखाने-शाळा तर कधी बनत नाही पण धर्माची कीड वाढत राहावी म्हणून गावात "धर्मस्थळ" १०० % बांधले जाते. यासाठी आपण त्या नेत्याला निवडून देतो. पण यामुळे तुमची मुलं शिक्षित होणार का ? रोजगार प्रश्न सुटला का ? तुमच्या गावात हॉस्पिटल सेवा बनली का किंवा सुधारली का ?पाण्याचा समस्या मिटल्या का ? हे प्रश्न कधी तुम्ही निवडून दिलेल्या नेत्याला / पक्षाला विचारले का ? कधी प्रश्न विचारण्याची साधी संधी तरी मिळाली का ?

 

३.  भारत हा  धर्मनिरपेक्ष देश आहे म्हणून त्याची ओळख होती. पण आज आपले लोकनेते उघडपणे धर्माच्या आणि जातीच्या नावाने भडकाऊ भाषण करतात. जातीभेदाचे विष पेरतात.  त्यामुळे दंगली ते मोबलिंचिंग सारखे अनेक गंभीर घटना वाढल्या आहेत. हजारो लोक आज याचे बळी ठरले आणि स्त्रियांवर अमानुषपणे लैंगिक अत्याचार झाले. ज्यात कायम सामान्य जनतेचाच बळी गेला आहे.  धर्म आणि  जात नावाच्या अफूने सामान्य जनतेला इतके व्यसनाधिन आणि निकामी बनवून ठेवले आहे कि तो याविरुद्ध प्रश्न विचारत नाही. उलट हि धर्म आणि जातीच्या नावाने जेव्हा नेता बोलेल "मारा कि कसलाही न विचार करता एक भारतीय आपल्याच दुसऱ्या  भारतीय बंधूला मारत सुटला आहे." मग आपण धर्मनिरपेक्ष भारत म्हणून का स्वातंत्र्यदिन साजरा करावा ?


आज ना आपल्याकडे समान न्यायव्यवस्था आहे. ना रोजगाराच्या संधी आहेत. ना चांगल्या प्रतीचे सरकारी शिक्षण गावोगावी आहे. ना पाणी समस्या मिटली. अनेक लैंगिक अत्याचार आणि दंगली करणारे आरोपी मोकाट सुटले. दंगलीत लाखोंची कत्तल होतेय .  तीन दिवस अमृत महोत्सवाला करोडो खर्च होतात. पण दुसरीकडे दोन वेळचे जेवण नाही म्हणून सामान्य माणूस तडफडून किंवा आत्महत्या करून मरतो आहे.  गरीब हा अधिक गरीब होत गेला. श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहे. पुन्हा याच गुंड प्रवृतीचे - धर्माचे विष पेरणारे आणि पैशासाठी क्षणाक्षणाला पक्ष बदलणाऱ्याला मत देणार असाल तर हा धर्मनिरपेक्ष - लोकशाही भारत नाही.   

मग नेमक्या कोणत्या लोकशाही भारताचा स्वातंत्र्यदिन आज साजरा होत आहे ?






सोमवार, ७ ऑगस्ट, २०२३

"समाजस्वास्थ्य" - रघुनाथ धोंडो कर्वे यांच्या जीवन कार्यावर आधारित एक उत्कृष्ट नाटक || Samajswasthya - R. D. Karve

 "समाजस्वास्थ्य" - रघुनाथ धोंडो कर्वे यांच्या जीवन कार्यावर आधारित एक उत्कृष्ट नाटक. 


समागम, हस्तमैथुन आणि लैंगिक इच्छा असे शब्द जरी आपल्या मोबाईलवर  दिसले. तर लाजेमुळे आज हि तो मोबाईल कोपऱ्यात नेऊन मग त्या पोस्टची लिंक आपण उघडून बघतो किंवा न बघताच अश्लिलतेचे लेबल लावून लगेच ती पोस्ट डिलीट करून टाकतो. 

तुमच्यासोबत पण असा अनुभव नक्कीच आला असेल. 

samajswastya-raghunath-karve-sex-education-apali-writergiri
PC: Facebook


आजही वयात येताना होणाऱ्या शारीरिक बदलांची आणि त्यांनतर वाढत जाणाऱ्या लैंगिक आकर्षणाची भीती आणि  अज्ञानामुळे मनात प्रचंड प्रश्न निर्माण होतात.   मनात येणाऱ्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आजूबाजूला कोणीच नसते. कोणाला जर आपण आपल्या मनातल्या भावना बद्दल सांगितले तर, " किती ते वाईट विचार , पापी विचार, चुकीच्या वळणावर मुलं चालली,  शेण खाल्लं वैगरे लेबल त्यांना दिले जातात.  अनेकजण आपण हे पाप केलं याच ओझं आयुष्यभर डोक्यावर घेऊन बसलेले असतात. अलीकडेच 'लैंगिक शिक्षण' हा विषय शाळेत नामपात्र शिकवायला सुरुवात झाली. पण तरीही 'लैंगिक शिक्षण' या विषयाबाबतीत शिक्षकांना आणि पालकांनाच जनजागृती नसेल तर ते विद्यार्थांना काय शिकवणार ? कसे शिकवणार ? 


सोशल मीडियाच्या जगात एका क्लिक वर सर्व गोष्टींची माहिती मिळते.  तरीही २०२३ मध्ये देखील "लैंगिक शिक्षण" हा एक टॅबू म्हणूनच पाहिला जातो.  पण र. धों. कर्वे यांनी  १९३० च्या दशकात लैंगिक शिक्षण आणि संततीनियमन याच ज्ञान लोकांपर्यंत पोहोचावं याकरिता 'समाजस्वास्थ्य' नावाचं मासिक सुरु केलं होत. त्यांची पत्नी मालती देखील त्यांच्या सोबत खंबीर उभ्या होत्या.  लैंगिक शिक्षण, लैंगिक स्वातंत्र्य, स्त्री मुक्ती, स्त्री शिक्षण, अभिव्यक्ती स्वातंत्र्य यासाठी र. धों. कर्वे यांनी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. त्यांनी या लेखांमधून लैंगिक साक्षरता नसल्यामुळे स्त्री-आणि पुरुष दोघांच्या हि शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर दुष्परिणाम होत असल्याचे मांडले होते. त्यांच्या बेधडक आणि स्पष्टरित्या विचार मांडल्यामुळे त्यांच्यावर १९३१ मध्ये व्यभिचाराचे अनेक गुन्हे दाखल झाले आणि दंड झाले. तरीही त्यांनी त्यांचे कार्य थांबविले नाही. त्यांनी समलैंगिक संबंधाबद्दल हि उघड भाष्य केले होते. त्यानंतर  १९३४ त्यांच्यावर "अश्लीलतेचे लेबल लावून" पुन्हा नवीन खटला दाखल झाला. यावेळी व्यक्ती स्वातंत्र्याचा विचार करून डॉ.  बाबासाहेब आंबेडकर खुद्द स्वतः त्यांचे वकील म्हणून उभे राहिले. बाबासाहेबांनी कर्वेंची बाजू खूप शिताफीने न्यायालयात मांडली.  तेव्हा नायमूर्तींनी देखील " लैंगिक शिक्षण कशाला पाहिजे ? का तो प्रश्न उत्तरांचा भाग ठेवला ? कशाला ती विकृती ? बोलत अनेक प्रश्न उभे केले. तेव्हा बाबा साहेबानी " जर ते प्रश्न विकृती असेल तर ती विकृती ज्ञानाने दूर होईल." अश्यापद्धतीने त्यांची बाजू मंडळी होती. कर्वेंचं लिखाण हे अश्लील नसून काळाला सुसंगत आणि समाज परिवर्तनासाठी किती गरजेचं आहे हे न्यायालयात पटवून देण्याचा त्यांनी  प्रयत्न केला पण धर्माच्या बेडीत अडकलेल्या आणि धर्मसंकल्पनेत शारीरिक संबंधांना घाणेरडं मानलं गेलेल्या काळात त्यांचं म्हणणं ऐकणार ते कोण ? खरतर १९३० ते आजचे २०२३  काळ बदलला म्हटले तरीहि आजच्या काळातही कोणी ते समजून घेईल असं वाटत नाही. शेवटी ती केस आंबेडकर आणि कर्वे हरले. कर्वेंना २०० रुपये इतका दंड झाला. पण तरीही कर्वेंनी मासिक छापणं सुरूच ठेवलं. 

२४ जून १९४० पुन्हा खटला दाखल झाला. त्यावेळी प्रथम खटल्याचा निकाल र. धो कर्वे च्या बाजूला लागला होता. 

लैंगिक शिक्षणाबाबत येणारे प्रश्न लोकांचे होते.  त्या प्रश्नाची विज्ञानदृष्टया योग्य उत्तरे देणे म्हणजे धर्माने बांधलेली समाजाची घडी विस्कटेल अशी भीती समाजाला वाटते. मग अस्वस्थ अवस्थेतच समाज पुढे चालत राहतो. एकीकडे आपण किती मॉडर्न झाल्याचे सोशलमिडियातुन दाखवतो. पण दुसरीकडे आज हि " लैंगिकता" म्हंटले कि तितकेच "अज्ञान" आहे जितके १९३० साली होते. 

या लेखामागील उद्देश इतकाच कि, जसे लैंगिक शिक्षण विषयाबाबतीत आपण सिग्मन्ट फ्राईड आणि अलबर्ट एलिस यांचे संदर्भ  वाचन करतो. त्या प्रमाणे भारतातील र धो कर्वेंच्या लेखनाचा हि अभ्यास करावा. तसेच आपल्याला लैंगिक शिक्षण आणि लैंगिक स्वातंत्र्य विषयाबाबतीत असेलेले गैरसमज दूर करावा.  

सदर नाटक युट्युबवर पाहायला मिळेल. किंवा खालील लिंकवर क्लिक केले तरीही नाटक पाहायला मिळेल. 

"Samajswastya YouTube Link"

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

लेखिका : अंजली प्रविण, ८+ वर्षांपासून समुपदेशक आणि डेटा विश्लेषक  म्हणून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. 

amkar.anju@gmail.com










इंडिया काय नि भारत काय || What is India, and what is Bharat?

PC:google इंडिया काय नि भारत काय मले काय मिळून राहिले त्याचे इंडियाचा भारत करा नाही तर भारताचा इंडिया करा मले काय मिळून राहिले त्याचे मले सा...