रविवार, १७ जुलै, २०२२

आजी आणि लिमलेटच्या गोळ्या..

 

*आजी आणि लिमलेटच्या गोळ्या*

माझं लहानपण कोकणातल्या एका उंच डोंगरावर वसलेल्या सुंदर अशा टुमदार गावात गेलं. मुंबई गोवा हायवेला लागून गाव असलं, तरी वाडीतुन हायवेकडे यायला त्यावेळी लोकांना 10 मिनिट पायपीट करून जावं लागे. त्यावेळी वीजही पोहचली नव्हती गावात. गावची त्यावेळी लोकसंख्या साधारण 50 ते 60 उंबऱ्यांची. या 60 घरांच्या मध्यातून खाली आणि वर जाणारी साधारण 800 पेक्षा  जास्त पायऱ्यांची पाखाडी आहे. ही पाखाडी म्हणतात देवाने बांधलेली, हीचा शेवट वरती "सडा" म्हणजे एक सपाट डोंगरावरचा भाग जिथे साधारण एक विमानतळ उभं राहील इतका मोकळा भाग, म्हणून त्याला सडा म्हणत. पूर्वी सर्वांची रहदारी याच पाखडीने होई. या पाखाडीचा खालचा शेवट जिल्हा परिषदेची शाळा, जिथे पिंपळाचे मोठे झाड आणि देवाची साण आहे तिथे. आता दुसऱ्या बाजूने रस्ता झाल्याने या पाखाडीने रहदारी कमी झाली आणि प्रवास गाड्यांनी सध्या वाढलाय, मग पर्यायाने सोबत आजारांचा प्रवासही तितकाच वाढला. आता कोणी पायाने चालतच नाहीत. काढली गाडी गेला बाजारातमागवली रिक्षा गेला फिरायला. पूर्वी सारखं नागमोडी वळण घेत जाणाऱ्या वहीवाटाही राहील्या नाहीत, पूर्वी या वहीवाटांवरून जाताना मध्येच लागणाऱ्या घरांतल्या लोकांना हाक मारत, विचारपूस करत जाण्याची मज्जा काही औरच होती! .. माझ्या आजीच्या मतानुसार आता लोकं डोक्याने चालतात (आमच्या आजीचे टोमणे,म्हणी,गाणी पुऱ्या गावात सर्वश्रुत, ती असेच ऐकवायची लोकांना बऱ्याचदा). चालणं कमी झाल्याने पर्यायाने आजार वाढले, पूर्वी हृदयविकाराने कोणी मेलं असं ऐकलंच नव्हतं आता सर्रास ऐकू येतं.

या पाखाडीने खालून पिंपळाडुन वाडीत यायला साधारण 15 मिनिट लागत आणि दम इतका लागे की, बस्स आता नकोच चालणं!..वाडीतून वर सड्याकडे जायला अजुन साधारण 25 मिनिटं लागंत. याच पाखाडीने तेव्हा लोकं उन्हाळ्यात 3 हांडे एकावर एक घेऊन पाणी भरत असंत. पाण्याची मोठी टंचाई उन्हाळ्यात असे आणि त्यात लग्न कोणाचे असले की अख्खा गाव त्या लग्न घरात पाणी देण्यासाठी मदत करत असे

पावसाळ्यात मात्र ही कोरडी पाखाडी अगदी पाण्याने न्हाऊन जायची..पाणी इतकं वाहायचं की, आम्ही मुलं कागदाची, झाडांची पानं घेऊन होडी बनवून यातून आपल्या मालकीची होडी  आनंदाने सोडत असू, इतकी श्रीमंती.

अशा या हिरव्यागार, माणसांनी भरलेल्या गावात माझं बालपण गेलं. प्रत्येक जण एकमेकांवर प्रेम करायचा. विचारपूस, आपुलकी यांनी आपल्याकडे काही कमी आहे याची लोकांना कोणालाच जाणीव नसायची. मी ही गरीब असूनही श्रीमंतीत न्हाऊन जगत होतो. आमचे आजोबा यांना एकूण 5 भाऊ आणि त्यांची मुलं आणि मग त्यांची मुलं अशी मिळून आम्ही भावंडं (चुलत, सख्खी) त्यात आत्या,काका असा मोठा गोतावळा असे

दिवसा शाळेतून आल्यानंतर खेळणे, खाणे,बागडणे असं सगळं एकत्र चाले. रात्री वीज नसल्याने बत्ती, कंदील यावर अभ्यास आणि अभ्यास झाला की चोरचिठ्या, काचाचे खेळ, खांब खांब, गाण्याच्या भेंड्या, गोष्टी नाहीतर असंच कोणी लग्नाची गाणी,चित्रपटातली गाणी ऐकवायचे. आम्ही मन लावून ऐकायचो किंवा तसं गाण्याचा प्रयत्न करायचो. असे छान दिवस जायचे.

आमचे आजोबा गवंडी कामाला जात, त्यांचे सगळे भाऊही तसंच काम करीत असंत, शिक्षण नसल्याने. मग ही मंडळी कामावरून आली की प्रत्येक नातवाला खाऊच्या पुड्या आणीत, प्रत्येकाला वेगवेगळ्या. या खाऊत चणे, शेंगदाणे, शेवबुंदी, चॉकलेट्स, गोळ्या, बिस्कीट, बुंदी लाडू, कुरमुरा लाडू असं वेगवेगळं असायचं. ही मेजवानी आम्हाला खास असायची. आम्ही सगळी चुलत, सख्खी भावंडं मिळून संख्या खूप असायची, त्या मानाने खाऊ कमीच पडायचा. पण आमची आजी त्याची विभागणी अगदी समान करायची. विशेष म्हणजे आमचे हे सगळे आजोबा त्यांच्या सूनांनाही खाऊची पुडी वेगळी आणून सुपूर्द करायचे. मला आठवतं या खाऊत जेव्हा लिमलेटच्या गोळ्या, चॉकलेट्स असायची तेव्हा तिचं वाटप करताना ती संख्येने नेहमीच कमी पडायची. मग आजी ह्या गोळ्या आपल्या पदरात पकडायची आणि दाताने तिचे तुकडे करून सगळ्यांना थोडे थोडे त्याचे वाटप करीत असे. यातूनच आम्ही शेअरिंग आणि केअरिंग शिकलो. आपल्याकडे कितीही कमी असले, तरी त्यातून सगळ्यांना आपण दिले पाहिजे हे आम्हाला आजीने शिकवले. खाऊच्या पुड्या सोडताना आमची चुलत भावंडंही सोबत असंत, त्यांनाही देता यावं यासाठी आजी या पदरातल्या गोळ्यांना दाताखाली चिरडायची..मुळात ती गोळी नाही तर आमच्या मनातला स्वार्थभाव चिरडायची आणि म्हणूनच आमच्यात आज आपल्याकडची प्रत्येक वस्तु दुसऱ्यालाही देण्याची भावना रुजली. या पदरातल्या गोळीला आम्ही उष्टी गोळी म्हणून कधीच हिणलं नाही. ती आम्हाला खूप गोड आणि श्रीमंत वाटायची कारण तिला आजीच्या प्रेमाचा आणि पदराचा स्पर्श होता.

आता आमच्या मुलांना 100 रुपयाच्या कॅडबरी चॉकलेट्स देतो आम्हीपण त्यांना तो मायेचा पदर आणि ती प्रेमाची श्रीमंती कुठून कळणारमग शेअरिंग आणि केअरिंग तर दुरचंच?

आजीचा पदर आणि तिच्या दाताखालची गोळी आम्हाला आजही आठवते, पण आज ना ती गोळी राहीली, ना पदर राहिला आणि ना आजी. पण आजीने दिलेली शिकवण, प्रेम यांनी आम्ही मात्र श्रीमंत झालो. आजही त्या आठवणीत न्हाऊन जातो. म्हणून आजही जेव्हा मी लिमलेटची गोळी बघतो तेव्हा आवर्जून मला आजीची आणि अजीच्या पदराची नक्कीच आठवण येते.🙂


दीपेश मोहिते, कल्याण

लिहायला, वाचायला आवडतं. निसर्ग भ्रमण, पक्षी निरीक्षण  करायची आवडं.

९ टिप्पण्या:

  1. खुप सुंदर..ur always good reader & writer.....
    असच लिहीत रहा... आम्ही वाचत राहू.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. तुमच्या बालपणीच्या आठवणी खूप छान आणि निरागस पद्धतीने मांडल्या आहेत त्यात कुठेही मोठेपणा दिसला नाही . कोकणा च वर्णन ही छान केले आहे आपण स्वतः तिकडे जाऊन आल्या सारखे वाटलं. आणि महत्वाचं म्हणजे आज मला ही माझी आजी आठवली. खूप छान लिखाण आहे तुमचें

      हटवा
  2. तू वर्णन केले ते ,मलाही
    लहानपणची आठवण झाली.सुंदर वर्णन केले आहेस.खूप सुंदर वर्णन !असेच लिही जा ! तुला शुभेच्छा!👍👍👌

    उत्तर द्याहटवा
  3. सुंदर! बालपणीच्या काही आठवणी काळ लोटला तरी किती ठळक असतात,नाही. विशेष म्हणजे त्यातल्या घटनांचे वयानुसार संदर्भ मात्र बदलत जातात. आजीने दाताखाली गोळीचे तुकडे करताना स्वार्थाभाव चिरडल्याची समज येण्यासाठी वेळ आणि शहाणपण यावं लागतो. वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर हाच अनुभव माणूस वेगवेगळ्या पद्धतीने जगतो ही आठवणींची खासियत.
    गावाचं वर्णन नयनरम्य वाटलं. पावसाळ्यात पाखाडीवरून पाणी वाहताना त्याचे ओहोळ कसे दिसत असतील हे डोळ्यांपुढे आलं.
    सुंदर लेखन👍
    आमच्या लहानपणी खोबऱ्याच्या, चिमणीच्या गोळ्या मिळायच्या. पेढ्याच्या पांढऱ्या गोळ्या फक्त वाण्याच्या पोरींकडे दिसायच्या. आजी दळण दळायला लावायची तेव्हा भावकीच्या एका दुकानातून मग मी त्या गोळ्या घ्यायचे. चार आणायला चार गोळ्या. दोघी बहिणींच्या समान वाटप. मात्र चुकून जर चुलत निलत कुणी बहीण भाऊ त्यादिवशी सोबत असले की वाईट वाटायचं. त्यांना द्यावं लागेल याची. कारण मग ते माझ्या हिश्श्यातून द्यावं लागायचं. पण देणं जरुरीचं, हे मात्र तेव्हाची मनावर ठासून बिंबलेलं.

    उत्तर द्याहटवा

कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन

 कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन   काही चांगल्या / कमावत्या मुलांची लग्न ठरत नाही मग ती मुलं किंवा त्याच्या घरचे मुलींना...